वेटींगवरील तिकिट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कातून रेल्वेची ३ हजार कोटींहून अधिक कमाई
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने 2 हजार 109 कोटी रुपये कमावले आहेत. माहिती अधिकारातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत 1 हजार 762 कोटी रुपये कमावले आहेत.
भारतात अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायीही मानला जातो. अनेकदा प्रवास करत असताना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. अशावेळी प्रवासी वेटिंगवर तिकीट काढतात. मात्र तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता नसल्यास किंवा अन्य कुठल्याही कारणाने तिकीट रद्द करावे लागते. अशावेळी भारतीय रेल्वेच्या वतीने तिकीट रद्द करण्यासाठी काही शुल्क आकारले जाते. या शुल्काच्या माध्यमातून रेल्वेने घसघशीत कमाई केली आहे.
माहिती अधिकार अधिनियमाच्या माध्यमातून इंदु तिवारी यांनी यांसदर्भात रेल्वे विभागाकडून काही दिवसांपूर्वी माहिती मिळवली. त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेने तिकीट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कामधून 2 हजार 109 कोटी रुपये कमावले तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत 1 हजार 762 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे लोकांचे वेटिंगवर असलेले तिकीट रद्द करणे रेल्वेच्या चांगल्याच फायद्याचे असल्याचे दिसून येते.
Latest Marathi News वेटींगवरील तिकिट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कातून रेल्वेची ३ हजार कोटींहून अधिक कमाई Brought to You By : Bharat Live News Media.