महाशिवरात्री : कल्याणकारी शिवांचे आराधना पर्व

– पं. विजयशास्त्री जोशी
माघ कृष्ण चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री ही संपूर्ण भारतभरामध्ये भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. भगवान शंकरांच्या कृपाशीर्वादांची पाखर मिळावी यासाठी शिवलिंगाचे यथासांग पूजन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. शिवभक्तांच्या द़ृष्टीने पवित्र व—त म्हणून महाशिवरात्रीची महती आहे. तसे पाहता प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र शिवरात्र मानली जाते; मात्र माघ महिन्यातील चतुर्दशीच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवपूजन केल्यास सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो, अशी धारणा आहे.
चतुर्दशी दोन दिवसांमध्ये विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून, रात्रीला महत्त्व आहे, हे स्पष्ट होते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून, त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. भगवान शंकरांच्या पूजनामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व सांगितले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ, शिखर शिंगणापूर आदी असंख्य शिवक्षेत्रांमध्ये यात्रा भरतात. ज्योतिर्लिंगांच्या पाण्याच्या कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीचे व—त कसे करावे, याविषयी धार्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये तपशीलवार विवेचने आढळतात. त्यानुसार उपवास, पूजा आणि जागरण ही या व—ताची तीन प्रमुख अंगे आहेत. महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधनापर्व मानले जाते. पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शंकरांनी रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला कालरात्री, असेही म्हटले जाते. याच महिन्यामध्ये सूर्याचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या महिन्यात होणारे ऋतुपरिवर्तनही शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता, असाही संदर्भ आढळतो. स्कंदपुराणामध्ये भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की, हे देवी, माझा जो भक्त शिवरात्रीचे व—त करतो, त्याला दिव्य गणत्व प्राप्त होऊन तो मोक्षाला जातो. महाशिवरात्रीचे व—त सर्व पापांचा नाश करणारे असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमीपेक्षा हजार पटींनी ऊर्जा कार्यरत असते. या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप करावा, असे धर्मशास्त्र सांगते. शंकरांच्या पूजनामध्ये रुद्रपूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आपल्याकडे लघुरुद्र, महारुद्र करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अलीकडील काळात अनेक अभ्यासकांनी रुद्रामधील मंत्रोच्चारांमुळे निर्माण होणार्या सकारात्मक तरंगांमुळे व्यक्तींच्या स्वभावप्रवृत्तींवर कसे अनुकूल परिणाम होतात, यासंदर्भातही अभ्यास केलेले आहेत.
वेद, शास्त्रे, पुराणे, तंत्रग्रंथ आदींनी शिवशंकरांच्या लीलांविषयी भरपूर उपदेश केलेला आहे. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल म्हणजेच विष प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवण्याचे कार्य शिवशंकरांनी केले. हे हलाहल कंठामध्ये साठवल्यामुळे त्यांच्या कंठ नीलवर्णीय झाला. त्यामुळे भगवान शिवांना नीळकंठ असेही म्हटले जाते. सहज प्रसन्न होणारे देवाधिदेव म्हणून त्यांना भोलेनाथ असेही म्हटले जाते. नृत्य आणि नाट्य या कलांचा प्रवर्तक, योगमार्गाचा प्रणेता आदी अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या महादेवांना बेलपत्र आणि पांढर्या रंगाची फुले अतिप्रिय आहेत. आरोग्यासाठी गुणकारी असणारी बेलपत्रे शिवसहस्र नामावली म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्यास अनंत जन्मांचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. शिवपूजनामध्ये रुद्राबरोबरच शिवमहिम्न स्तोत्र, शिवकवच यांचेही पठण पुण्यदायी ठरते. ‘ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधीं पुष्टीवर्धनम्, उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात’ या मंत्राचा जप करून शंकरांना नित्यनेमाने अभिषेक केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकरण होते. याखेरीज शिवपूजनामध्ये भस्मालाही महत्त्व आहे. भक्तिमार्गामध्ये सर्वांत महत्त्वाचा असतो भाव. निरपेक्ष भावाने, अंतःकरणपूर्वक आणि इहलोकाचा विसर पडून तल्लिनतेने भक्ती करण्याने ईश्वरी कृपा प्राप्त होत असते.
Latest Marathi News महाशिवरात्री : कल्याणकारी शिवांचे आराधना पर्व Brought to You By : Bharat Live News Media.
