
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या संदर्भातली सुनावणी आज (दि. ७) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात जे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते, त्यानुसार त्यांनी निर्णय दिलाय का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना केला. यामुळे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर बोट ठेवले आहे. तसेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहेत. या प्रकरणावर पुढची सुनावणी आठ एप्रिलला होणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन्ही बाजूंचे आमदार पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, याच प्रकारची याचिका शिंदे गटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीतून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केले जाणार की मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणले जाणार हे ठरेल असे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीसाठी ८ एप्रिल ही पुढची तारीख दिली आहे आणि त्यानंतर हे ठरवू असे म्हटले आहे. या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच व्हावी हा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे, त्यामुळे ठाकरे गटाला हा काहीसा दिलासा मानला जातो. नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, तसे न झाल्यास हे प्रकरण निरस्त ठरेल अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात काही निर्देश देण्यात आले होते. त्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलाय का? असा सवाल आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना केला. तसेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहेत. खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का? असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. आमच्या निकालपत्रात जे लिहिलेले आहे त्याविरोधात निर्णय झालाय का? असा सवाल सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना विचारला. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी तर ठाकरे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी, मुकुल रोहोतगी यांनी युक्तिवाद केला. कपिल सिबल युक्तिवाद करताना म्हणाले की, नोव्हेंबर मध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे या प्रकरणावर लवकर सुनावणी झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला. तसेच या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणीची आवश्यकता नाही असेही ते म्हणाले.शिंदे गटाकडून युक्तिवाद करताना हरीश साळवे यांनी ठाकरे गटाने सादर केलेले कागदपत्रे खोटे असल्याचा दावा केला. तसेच कायद्याचा प्रश्न नंतर आहे. मात्र कागदपत्रे खरी की खोटी हे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे आणि न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आहे, असाही युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला.
हेही वाचा
Electoral Bond प्रकरणात SBI अडचणीत; सुप्रिम कोर्टात अवमान याचिका दाखल
Bengaluru Water Crisis : आयटी सिटी बंगळुरूत पाणीबाणी : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात टँकरने पाणीपुरवठा; जनजीवन कोलमोडले
लोकसभेसाठी अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’ला हव्यात 12 जागा!
Latest Marathi News सुप्रीम कोर्टच्या ‘त्या’ प्रश्नाने ठाकरे गटाला मिळणार दिलासा? ‘विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय…’ Brought to You By : Bharat Live News Media.
