पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंचा सहभाग

अंतिम तुकडीस क्रीडा मंत्रालयाची मंजुरी, सर्वांत मोठे दल अॅथलेटिक्सचे, गोळाफेकपटू आभा खटुआला मात्र गाळले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली क्रीडा मंत्रालयाने पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी अंतिम तुकडी मंजूर केली असून या महिन्यात होणाऱ्या या खेळांत भारताचे प्रतिनिधीत्व 117 खेळाडू करतील. या पथकामध्ये 140 साहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी देखील आहेत, ज्यापैकी 72 जणांचा खर्च प्रवासी खेळाडूंच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी. […]

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंचा सहभाग

अंतिम तुकडीस क्रीडा मंत्रालयाची मंजुरी, सर्वांत मोठे दल अॅथलेटिक्सचे, गोळाफेकपटू आभा खटुआला मात्र गाळले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रीडा मंत्रालयाने पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी अंतिम तुकडी मंजूर केली असून या महिन्यात होणाऱ्या या खेळांत भारताचे प्रतिनिधीत्व 117 खेळाडू करतील. या पथकामध्ये 140 साहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी देखील आहेत, ज्यापैकी 72 जणांचा खर्च प्रवासी खेळाडूंच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी. सरकार उचलणार असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत चालणार आहे. वरील यादीतून एकमेव पात्र खेळाडूचे नाव गायब आहे आणि ती म्हणजे गोळाफेकपटू आभा खटुआ आहे. जागतिक क्रमवारीतील कोट्यातून पात्र ठरलेल्या खटुआला काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जागतिक अॅथलेटिक्सच्या ऑलिम्पिक स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता तिचे नाव वगळण्यात आले आहे. दुखापत, डोपिंग उल्लंघन किंवा इतर कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे तिचे नाव बाद झाले आहे का याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेते माजी नेमबाज गगन नारंग हे ‘चिफ दि मिशन’ असून नारंग हे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष देखील आहेत. मंजूर करण्यात आलेली उर्वरित तुकडी ही अपेक्षित अशीच आहे. ‘2024 ऑलिम्पिक खेळांसाठी पॅरिस आयोजन समितीच्या निकषांनुसार क्रीडा ग्राममध्ये कर्मचाऱ्यांना राहण्याची मर्यादा 67 आहे. यात 11 ‘आयओए’ पथक अधिकाऱ्यांचा समावेश होतो. ज्यात पाच वैद्यकीय पथक सदस्यांचा समावेश आहे’, असे मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘खेळाडूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रशिक्षक आणि इतर साहाय्यक कर्मचारी मिळून 72 जणांना सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यांचा खर्च सरकार उचलणार आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था क्रीडा ग्रामबाहेरच्या ठिकाणी व हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे’, असे त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे.
खटुआची अनुपस्थिती असूनही अॅथलेटिक्सचा गट हा 29 नावांसह (11 महिला आणि 18 पुऊष) सर्वांत मोठा असून त्यानंतर नेमबाजी (21 खेळाडू) आणि हॉकी (19) यांचा क्रमांक लागतो. टेबल टेनिसमध्ये आठ खेळाडू प्रतिनिधीत्व करतील, तर बॅडमिंटनमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या पी. व्ही. सिंधूसह सात स्पर्धक असतील. कुस्ती, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यामध्ये प्रत्येकी सहा खेळाडू असतील. त्यानंतर गोल्फ (4), टेनिस (3), जलतरण (2), नौकानयन (2) आणि अश्वारोहण, ज्युदो, रोइंग आणि वेटलिफ्टिंग (प्रत्येकी 1) यांचा क्रमांक लागतो.
दुसऱ्या क्रमांकावरील नेमबाजी दलात 11 महिला आणि 10 पुऊषांचा समावेश आहे, तर टेबल टेनिसमध्ये दोन्ही श्रेणींमध्ये प्रत्येकी चार खेळाडू आहेत. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदकविजेती मीराबाई चानू ही दलातील एकमेव वेटलिफ्टर आहे आणि ती महिलांच्या 49 किलो वजनी गटात भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व 119 सदस्यांच्या तुकडीने केले होते आणि देशाने नीरज चोप्राच्या ऐतिहासिक भालाफेक सुवर्णासह सात पदकांची कमाई करत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. चोप्रा आपले पदक राखण्याचा प्रयत्न पॅरिसमध्ये करेल.