खोचीमध्ये नागरी वस्तीमध्ये शिरलं वारणेचं पाणी ! नागरीकांचे स्थलांतर
खोची, वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील खोची, भेंडवडे परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीचे पाणी शुक्रवारी,शनिवारी मोठ्या प्रमाणात वाढले.त्यामुळे पाणी धोका पातळीच्या दिशेने आले आहे.खोची येथे नागरी वस्तीत पाणी आले आहे.दोन्ही गावातील प्रथम पूरबाधित होणाऱ्या काही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
नदीकाठाची,पूरबाधित होणाऱ्या कुटुंबातील जनावरे स्थलांतर केली आहेत.तसेच पूरबाधित होणाऱ्या अनेक कुटुंबांनी आपल्या सामानाची बांधा बांध करून ठेवली आहे. खोची येथील भैरवनाथ मंदिर परिसर पुराच्या पाण्याने पूर्ण व्यापला असून मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.. मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.गावात गणेश मंदिर परिसर, काटकर गल्ली येथे पाणी आले आहे. प्रचंड पाऊस व वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पाणी जलद वाढले आहे.भेंडवडे,खोची येथे प्रचंड पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे.
भेंडवडे येथील गणेश मंदिर,हनुमान चौकात वारणा नदीला जाणाऱ्या लक्ष्मी ओढ्याचे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने व पुराचे पाणी आल्याने हा परिसर जलमय झाला आहे.पूरबाधित होणाऱ्या अनेक कुटुंबानी स्थलांतर केले आहे.त्यांची व्यवस्था प्राथमिक शाळा,हायस्कूल,नातेवाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पाणी गेले आहे.त्यांनी माळ भागात आपली पर्यायी व्यवस्था केली आहे.भेंडवडे येथील ओढ्यावरील पुलावर व लाटवडे येथील मंजनवली पिराच्या दर्ग्याजवळ पाणी येऊन पेठ वडगांवला जोडणारा भेंडवडे लाटवडे हा मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान या पुराच्या पाण्यामुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली जाऊन त्यामधील ऊस,सोयाबीन, भुईमूग अन्य खरीप पिके यांचे लाखो रुपयांचे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.शेतात व गावात पावसाचे प्रचंड पाणी साचून दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
खोची,भेंडवडे येथे वारणा नदीच्या पुराच्या पाण्यावर व पुरग्रस्त कुटुंबावर महसूल,ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असून मंडल अधिकारी राजश्री पचडी,तलाठी प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.बी.पाटील, कृषी सहाय्यक अमोल कोळी, भेंडवडे येथे तलाठी प्रवीण तोडकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते हे पूरबाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी आरोग्य विभाग सर्तक असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वारणा नदी काठाचा पुराच्या पाण्याचा भागाचा वीज पुरवठा खंडित केला आहे.